जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश 
शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर येथे चोपडा जीन ते पाचकंदील मार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे सह उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत, छोटू पाटील, मंगेश पवार,सर्जेराव पाटील, राजू टेलर, गिरीश देसले हे करणार आहेत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व शिरपूर तालुका हा कष्टकरी, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेचा भाग म्हणून ओळखला जातो. तापी, पांझरा, बुराई यांसारख्या नद्यांचे वरदान लाभलेल्या या प्रदेशात आज शेतकरी पाण्यासाठी हवालदिल आहे वीजेच्या लपंडावामुळे शेती व्यवसाय उध्वस्त होत आहे. महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.
शासन विकासाच्या घोषणा करत आहे, मात्र प्रत्यक्षात शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील जनतेच्या वाट्याला उपेक्षा, अन्याय, भ्रष्टाचार आणि प्रशासनाची उदासीनता आली आहे. जनतेचा संयम आता संपत चालला असून या सर्व प्रश्नांवर निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे.
*सिंचन व पाणी प्रश्न*
तापी नदीच्या परिसरात असूनही अनेक गावांतील शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. कालवे गाळाने भरले आहेत. बंधारे व जलसंधारणाची कामे अपुरी आहेत.
अनियमित पाऊस, वाढते तापमान आणि नियोजनाच्या अभावामुळे केळी, कापूस, मका, कांदा, भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पाणी असतानाही व्यवस्थापन नाही आणि गरजेच्या वेळी उपलब्धता नाही, ही शोकांतिका आहे
*वीज प्रश्नामुळे शेतकरी त्रस्त*
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हा मोठा प्रश्न बनला आहे. शेतकऱ्यांना रात्री अपरात्री वीज दिली जाते. कमी दाबामुळे मोटारी जळतात. ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर अनेक दिवस बदलले जात नाहीत.
*शेतकरी अभूतपूर्व आर्थिक संकटात*
कापूस, मका, केळी, कांदा, डाळी व इतर पिकांचे उत्पादन घेणारा शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात आहे. खते, बियाणे, कीटकनाशके, इंधन, वीज व मजुरीचे दर वाढले आहेत. मात्र शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही.
पीकविमा योजनांतील त्रुटींमुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊनही मदत वेळेवर मिळत नाही. वाढता कर्जबोजा आणि घटते उत्पन्न यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे.
*फसवी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची क्रूर फसवणूक*
शासनाने कर्जमाफीच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या; मात्र प्रत्यक्षात शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. कर्जमाफीच्या निकषांमध्ये अशा अटी घालण्यात आल्या की अनेक पात्र शेतकरी योजनेबाहेर फेकले गेले.
एका बाजूला शेतकरी नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील घसरण आणि कर्जबाजारीपणाशी झुंज देत आहे; तर दुसऱ्या बाजूला शासन कागदी कर्जमाफीचा गाजावाजा करत आहे. बँकांच्या नोटिसा, वसुलीचा दबाव आणि आर्थिक ताण यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या या फसव्या कर्जमाफी धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो.
*महागाईचा सर्वसामान्यांवर घाला*
गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळी, औषधे, शिक्षण व आरोग्य खर्च यामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.महागाईमुळे शेतकरी, कामगार, शेतमजूर, लघु व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे.
*बेरोजगारीचा वाढता प्रश्न*
शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील हजारो युवक उच्चशिक्षित असूनही बेरोजगार आहेत. स्थानिक उद्योगधंद्यांचा अभाव, नवीन गुंतवणूक नसणे,शासकीय भरतीतील विलंब आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे युवकांचे भविष्य अंधारात गेले आहे गावोगावी तरुणांचे स्थलांतर वाढत असून ही परिस्थिती चिंताजनक आहे म्हणून शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी, बेरोजगार तरुण व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान कल्याण बागल,अभय भदाणे, शैलेश सोनार, ईश्वर पाटील, विभा जोगरावा, संतोष देसले, भटू शिंदे, हिरालाल बोरसे, अशोक महाराज, योगेश सूर्यवंशी, रावसाहेब ईशी, सागर देसले, रमेश बोरसे,अनिकेत बोरसे, नंदकिशोर पाटील, मनोहर राजपूत,राजूनाना पवार, राजू कोळी,देवेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, राजू माळी, चंद्रसिंग ठाकूर,आधार बोरसे, दीपक ओतारी, मनोज पवार, संतोष माळी, योगेश चौधरी,महेंद्र धनगर, संजय मगरे इत्यादींनी केले आहे
आमच्या प्रमुख मागण्या
१. महागाई नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात
२. शेतकऱ्यांना ८ ते १० तास नियमित वीजपुरवठा द्यावा.
३. जळालेले ट्रान्सफॉर्मर २४ तासांत बदलण्याची व्यवस्था करावी.
४. शेतमालाला हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी करावी.
५. पीकविमा व नुकसानभरपाई तातडीने वितरित करावी.
६. सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.
७. कर्जमाफीतील अन्यायकारक अटी रद्द करून वंचित शेतकऱ्यांना लाभ द्यावा.
८. कर्जवसुलीची कारवाई तात्काळ स्थगित करावी.
९. युवकांसाठी रोजगारनिर्मिती व औद्योगिक गुंतवणूक वाढवावी.
१०. हाळाखेड टोलनाक्यावरील व महसूल विभागातील भ्रष्टाचार तात्काळ थांबवावा






















