आईच्या संस्कारांनी ती आजही जिवंत… पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त शांताआई (भाभु) यांना विनम्र अभिवादन !
✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी…” – ही ओळ केवळ म्हण नसून, प्रत्येकाच्या आयुष्यातील अटळ सत्य आहे. आई ही केवळ जन्म देणारी नसते, तर तीच आपल्या जीवनाची दिशा ठरवणारी पहिली गुरू असते. १४ एप्रिल २०२१ हा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत दुःखद दिवस ठरला. त्या दिवशी माझी आई शांताबाई उर्फ भाभु यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्या प्रत्यक्षात दूर गेल्या असल्या तरी त्यांच्या दिलेल्या संस्कारांच्या रूपाने त्या आजही जिवंत आहेत – प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत.
शांताआई यांचे आयुष्य म्हणजे संघर्षाचे मूर्तिमंत उदाहरण होते. माहेरी सुखवस्तू परिस्थितीत वाढलेल्या या माऊलीवर नियतीने अचानक कठीण प्रसंग ओढवले. मी केवळ दोन वर्षांचा असताना वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर आईने स्वतःचे सर्वस्व विसरून मुलासाठी आयुष्य वाहून घेतले. माझे वडील गेल्यावर, घरावर कर्जाचा डोंगर, समाजाचा दबाव, कोर्ट-कचेऱ्यांचे चक्र – अशा अनेक संकटांशी सामना करताना त्यांनी कधीही हार मानली नाही. अथक परिश्रम, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी सर्व कर्ज फेडले आणि मुलाचे भविष्य घडवले.
आईने दिलेले संस्कार हेच माझ्या आयुष्याचे खरे भांडवल ठरले. “कोणी कितीही वाईट वागले तरी आपण चांगलेच वागायचे”, “मोठ्यांशी आदराने बोलायचे”, “खोटे बोलू नये, चोरी करू नये, शिवीगाळ करू नये” – या शिकवणी त्यांनी केवळ शब्दांमध्ये नाही, तर कृतीतून दिल्या.
लहानपणी घडलेले काही प्रसंग आजही माझ्या मनात जिवंत आहेत. एकदा खेळताना शिवी दिल्याबद्दल आईने दिलेली शिक्षा आणि त्यातून मिळालेली शिकवण आयुष्यभरासाठी पुरली. तसेच एकदा घरातून ४० पैसे चोरल्यावर आईच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून मला प्रामाणिकपणाचे खरे मूल्य समजले. शेजाऱ्यांचे सापडलेला एक रुपया परत करताना मिळालेला आनंद आणि आईच्या चेहऱ्यावरचे समाधान माझ्या आयुष्याला योग्य दिशा देणारे ठरले.
आईने दिलेली माणुसकी, संयम, आदर आणि प्रामाणिकपणा हीच आज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. “आज मी जो काही आहे, तो फक्त माझ्या आईमुळेच,”आई गेल्यानंतर तिच्या नसण्याची पोकळी कधीही भरून निघत नाही. विशेष म्हणजे तिच्या शेवटच्या क्षणी तिच्या जवळ नसल्याची खंत माझ्या मनात कायमची घर करून राहिली आहे. त्या वेळी मी स्वतः हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आयूसीयू त मृत्यू शी झुंज देत उपचार घेत होते आणि आईच्या निधनाची बातमीही मला आईच्या दहाव्या दिवशी समजली अतिव दुःख झाले. – ही वेदना माझ्या आयुष्यभर सोबत राहणारी आहे.
आजही असा एकही दिवस जात नाही, जेव्हा मला आईची आठवण येत नाही. तिचे अस्तित्व त्यांच्या प्रत्येक चांगल्या कृतीत, योग्य निर्णयात आणि मनात कायम वसलेल्या आठवणीत जाणवते.
आईशिवाय आयुष्य अपूर्णच… खरंच, “आईविना माणूस भिकारीच…” आईच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त त्या माझ्या महान आईला कोटी कोटी प्रणाम अर्पण करतो……
शोकाकुल
श्री भिका पाटील (मुलगा) सौ. जागृती पाटील (सून) कु. डॉ. प्रज्ञा पाटील (नात)
कु. इंजी. ऋषिकेश पाटील (नातू)
समस्त ठाकरे परिवार, अलाने ता. शिंदखेडा

















