
शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) : – विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून अंधश्रद्धांना थारा देणाऱ्या प्रवृत्ती पासून त्यांना परावृत्त करावे, अनेक विद्यार्थी आणि युवा वर्ग भोंदू बुवा बाबांच्या नादी लागून विवेक बुद्धी गमावतात, त्यांना रोखण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन शिंदखेडा येथील गटविकास अधिकारी रमेश नेतनवार यांनी केले.
पंचायत समिती शिंदखेडा शिक्षण विभाग ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सहकारी पतसंस्था आयोजित वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या समारोप सत्रात ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आयोजित शिबिराचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी डी एस सोनवणे यांनी केले. यावेळी देवांच्या नावाने कोणी आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण करत असेल तर त्यांच्यापासून सावध राहण्याची सूचना त्यांनी केली.त्या नंतर मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून एम एच एस एस ज्यू. कॉलेज चे प्राचार्य टी एन पाटील यांनी म्हटले की विज्ञान निष्ट समाज निर्मितीसाठी अश्या शिबिराची नितांत गरज आहे
पहिल्या दिवशी माध्यमिक शिक्षीकांपैकी तालुक्यातील पंचावन्न महिला सहभागी झाल्या होत्या. पहिल्या सत्रात शिंदखेडा अंनिस चे कार्याध्यक्ष प्रा दीपक माळी यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर स्रीया आणि अंधश्रद्धा या विषयावर अंनिसचे राज्य कार्यवाह प्रा परेश शाह यांनी मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात कार्यवाह राज्य कार्यवाह सुरेश बोरसे आणि शाखा सचिव भिका पाटील यांनी हात चलाखी आणि रसायने यांचा वापर करून बुवा बाबा कशी फसवणूक करतात ते सप्रयोग दाखविले. या प्रयोगांचे स्पष्टीकरण करण्यात आले. सहभागी शिक्षीकांनी गटचर्चा घडवून आणली. त्यासाठी प्रा संदीप गिरासे, प्रा अनिरुद्ध महानोर यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे विवेकवादी नागरिक घडवण्याची हमी शिक्षकांनी दिली.
दुसऱ्या दिवशी तालुक्यातील ८० माध्यमिक शिक्षक सहभागी झाले. उद्घाटन नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांनी केले. या शिक्षकांना शिरपूर येथील डॉ पि के साळुंखे यांनी मन मनाचे आजार या विषयावर मार्गदर्शन केले. याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्काराचे प्रयोग आणि गटचर्चा अशी सत्रे झाली.
समारोपाचा कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके, उपनिरीक्षक वैभव देशमुख, पतसंस्थेचे संस्थापक प्रा. सतीश पाटील, हे.का. चेतन माळी उपस्थित होते.
श्री.ढोके यांनी पोलीस सेवेत असताना शोषण करणारी प्रकरणे समोर आणून भोंदू बाबांच्या नादी लागू नये, ऋषीमुनी संत, समाज सुधारक यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले, असे प्रतिपादन केले. प्रा सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
शिबिर संयोजनासाठी भिका पाटील, प्रा संदीप गिरासे, सुरेश बोरसे, प्रा परेश शाह, डॉ पि के साळुंखे, प्रा ए एम महानोर, प्रा दीपक माळी, प्रा सतीश पाटील, जयपाल गिरासे, योगेश गिरासे आणि पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.






















