डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी. सावित्रीबाई फुलेंनी महिला व शोषितांच्या हक्कांसाठी लढा दिला प्राचार्य डॉ. .पी.एस.गिरासे. ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा धुळे: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य शिक्षण, समाजसुधारणा आणि स्त्री-मुक्तीवर केंद्रित होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महिला, वंचित आणि शोषित वर्गांच्या शिक्षण व हक्कांसाठी जीवनभर लढा दिला असे प्रतिपादन भाऊसो. एम. डी. सिसोदे महाविद्यालय, नरडाणा येथील प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांनी डॉ. पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय येथे केले.. 03 जानेवारी 2026 रोजी श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर डॉ. पा. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी विद्याथ्यांना मार्गदर्शन करतांना प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमास उपप्राचर्य प्रा. के एम बोरसे, उपप्राचार्य डॉ. यू.जी. पाटील, रसेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. ए. मोरे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. भिकन खैरनार, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. सौ.पी. एस. सिसोदे तसेच. प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.प्राचार्य डॉ. गिरासे पुढे म्हणाले की, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत सत्यशोधक समाजात सक्रिय राहून स्त्रीयांना शिक्षण देण्याबरोबरच साहित्याच्या माध्यमातून समाजातील विषमतेवर घाव घातला आणि स्त्रिया व वंचित घटकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी जीवन समर्पित केले. आज समाजात स्त्रियांचा झालेला विकासाचे मूळ प्रेरणास्थान सावित्रीबाई फुले आहेत. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली आणि पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका बनल्या. त्यांनी एकूण १८ मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी जातिभेद आणि अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. विधवांचे केशवपन ही कुप्रथा थांबवण्यासाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला. बालविवाह आणि सती प्रथेसारख्या कुप्रथांना विरोध केला. विधवा आणि परित्यक्तांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केले. त्यांनी ‘काव्य फुले’ आणि ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ यांसारख्या काव्यसंग्रहातून सामाजिक विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला व युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून स्वत:चा सर्वांगीन विकास साधावा तसेच महविद्यालयातील आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात नियमित सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रासेयो स्वयंसेवक वैशाली कैलास पाटील हिने केले. सूत्रसंचालन सनी पवार यांनी केले तर आभार अजय ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले.















